खांडवप्रस्थ वनात लागलेली आग अग्निदेवांच्या सहाय्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनाने विझवली. या प्रचंड आगीत आपला जीव वाचल्यामुळे मयासूर राक्षसाने पांडवांना त्यांच्या इंद्रप्रस्थ नगरीत त्यांची राजधानी बांधण्यासाठी तसेच राजमहाल बांधण्यासाठी मदत केली. मयासूर हा रावणाचा सासरा तर होताच पण त्याचबरोबर तो एक निपूण वास्तु शिल्पकारदेखील होता. सर्व देवदेवता, गंधर्व, राजे आणि ऋषिमुनी हा आलिशान राजमहाल पहायला आले. स्वत: युधिष्ठिराने या सर्वांचे यथोचित आदरातिथ्य केले. त्याचवेळी देवर्षी नारदमुनींच्या उपस्थितीत राजसूय यज्ञ करावा असे युधिष्ठिराच्या मनात आले. त्याने हा विचार आपल्या बंधुंना व दरबारातील मंत्र्यांना बोलून दाखवला. राजसूय यज्ञाबद्दल ऐकताच सर्वांनी अतिशय आनंदाने होकार दिला. सर्वांनी जरी होकार दिला असला तरी युधिष्ठिराला श्रीकृष्णाच्या परवानगीची आवश्यकता होती. भगवान श्रीकृष्ण येताच युधिष्ठिराने आपला यज्ञाबद्दलचा मानस त्यांना बोलून दाखवला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजसूय यज्ञ करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता तुझ्या अंगी आहेत. परंतू राजसूय यज्ञ करण्याआधी मगध नगरीचा राजा जरासंध याचा तुला वध करावा लागेल. संपूर्ण पृथ्वीवर सत्ता गाजवण्याच्या हेतूने जरासंध महादेवांना प्रसन्न करत आहे. त्यासाठीच तो एका यज्ञाचे आयोजन करत आहे. यज्ञात बळी देण्यासाठी त्याने शेकडो राजांना कैदेत ठेवले आहे. त्यामुळे जरासंध जीवंत असताना तू राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडू शकत नाहीस. जरासंध निश्चितपणे तुझ्या यज्ञात विघ्न आणणार. दुष्ट मार्गाने जाणाऱ्या जरासंधाचा नाश होणं आता आवश्यक आहे.
त्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर व इतर पांडवांना म्हणाले,” जरासंधाकडे विशाल सैन्य आहे. त्यामुळे आपण त्याच्याशी थेट युध्दाची घोषणा करू शकत नाही. जरासंध हा ब्राम्हणांना फार मान देतो. त्यामुळे आपण ब्राम्हणांचा वेश धारण करून त्याच्यासमोर जाऊया. अर्जुन आणि भीम तुम्हीदेखील माझ्यासोबत चला.” श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम तिघेही ब्राम्हणाचा वेश धारण करून जरासंधाच्या महाली पोचले. आपल्या ताकदीचा जरासंधाला गर्व असला तरीही त्याने या तीन ब्राम्हणांना पाहून आदराने मान झुकवून नमस्कार केला. भगवान श्रीकृष्ण,अर्जुन आणि भीम यांच्याकडे पाहत, जरासंधाला म्हणाले, या दोन ब्राम्हणांचे आज मध्यरात्रीपर्यंत मौन आहे. जरासंधाने जराही विलंब न करता या तिन्ही ब्राम्हणांची एका कक्षात सोय केली व मध्यरात्र उलटण्याची वाट पाहू लागला.
काही काळाने जरासंध या ब्राम्हणांच्या कक्षात आला आणि म्हणाला, जरी तुम्ही ब्राम्हणाचा वेश धारण केला असला तरी तुमच्यात क्षत्रियत्व दिसत आहे. तुमचे सत्य मला समजलेच पाहिजे.