स्यमंतक मण्याची कहाणी - जेव्हा भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आरोप झाला होता
श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया.
स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे. एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का! यावेळी त्याच्यावर जगातली सर्वात मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप करण्यात आला. भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप केला गेला होता. या आरोपातलं सत्य काय होतं? भगवान श्रीकृष्णाने खरोखरच त्या मौल्यवान मण्याची चोरी केली होती का? जर नसेल तर मग त्याच्यावर असा आरोप का करण्यात आला? श्रोतेहो या कथेत आज आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी जांबवंती आणि सत्यभामा या दंतकथेशी संबंधित आहेत. तर मग अधिक वेळ न घालवता आपण ही रंजक कथा ऐकूया आणि त्यासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरंही जाणून घेऊया.
अंधकवंशी यादवांचा राजा सत्रजीत हा भगवान सूर्यदेवांचा श्रेष्ठ भक्त होता. सत्रजिताने अनेक वर्षे सूर्यदेवांची उपासना केली. एके दिवशी सकाळी सत्रजीत नेहमीप्रमाणे सूर्यपूजा करत होता, त्या वेळी साक्षात भगवान सूर्यदेव सत्रजितासमोरच प्रकट झाले तेव्हा त्याने हात जोडून वंदन केलं आणि तो म्हणाला, “देवा, ज्या तेजानं आपण संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करता, कृपया ते तेज आपण मला द्यावं.” सत्राजिताची ही विनंती ऐकून त्याला भगवान भास्कर यांनी दिव्य असा स्यमंतक मणी दिला. हा मणी भगवान सूर्यांच्या तेजाने प्रकाशित झालेला होता. जेव्हा सत्रजितने स्यमंतक मणी आपल्या गळ्यात परिधान करून त्याच्या नगरात प्रवेश केला, तेव्हा जणूकाही स्वत: सूर्यदेवच आले आहेत असं सर्वांना वाटत होतं.
सत्रजितने हा मणी त्याच्या धाकट्या लाडक्या भावाकडे प्रसन्नजितकडे दिला. ह्या मण्याने अंधकवंशी यादवांच्या घरात समृद्धी आणली. स्यमंतक मणी ज्या ज्या भागात असायचा त्या त्या ठिकाणी आजूबाजूच्या भागात वेळेवर पाऊस पडत असे. लोक सर्व आजारांपासून मुक्त असत. भगवान श्रीकृष्णाला जेव्हा या स्यमंतक मण्याबद्दल समजलं, तेव्हा त्याने प्रसन्नजिताकडून हा मणी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु प्रसन्नजिताने श्रीकृष्णाला हा मणी द्यायला नकार दिला.